Sunday, August 16, 2009

शाहरूखच्या निमित्ताने

बॉलिवूड किंग शाहरूख खानला काल अमेरिकेमध्ये एअरपोर्टवर अडवलं आणि त्याची चौकशी केली. त्याच्या नावात ‘खान’ असल्याने हे घडलं आणि सबंध देशातून अमेरिका विरोधी प्रतिक्रिया उमटल्या.

याच घटनेच्या काही दिवस आधी इम्रान हाश्मी याला तो मुसलमान असल्याने घर नाकारण्यात आलं होतं आणि समाजात पुन्हा एकदा मुस्लिमांच्या स्थितीबद्दल उलट-सुलट चर्चा झाली. मग त्यानेच या परिस्थितीपासून घुमजाव करत आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्याआधी शबाना आझमीनेही असाच आरोप केला होता की मुस्लिमांना या देशामध्ये घर मिळणंही मुश्कील झालं आहे.

महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात एक विचित्र निर्णय घेतला. ज्या मुस्लीम मुलांनी हिंदू मुलींशी विवाह केला आहे त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करणार. कारण काय त्यांना जबरदस्तीने हा विवाह करायला भाग पाडण्यात आलं आहे, असं एका मंत्र्याचं स्वतःचंच अनुमान.

पहिल्या तीन घटना या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींबरोबर घडल्या आणि त्यांना लगेच प्रसिद्धी मिळाली. पण असे अनेक मुस्लिम आहेत की ते केवळ सर्वसामान्य असल्याने त्यांच्याबरोबर घडलेल्या अशा घटना प्रकाशझोतात येत नाहीत.

काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त मालेगावला गेले होते. तिथे काही बायका भेटल्या. एक वर्षाहून अधिक काळ त्यांचे नवरे हे जेलमध्ये होते, मुंबईत झालेल्या विविध बॉम्बस्फोटांच्या आरोपावरून. आता खरे आरोपी सापडूनही त्यांना सोडण्यासाठी सरकारचे काही विशेष प्रयत्न नाहीत. पुन्हा आपले नवरे परत येतील याची शाश्वती त्यांना नाही.

अलीकडेच लष्करची अतिरेकी म्हणून मारण्यात आलेल्या खालसा कॉलेजमधल्या इशरत जहॉं या विद्यार्थीनीची केस सुप्रीम कोर्टाने पुन्हा तपासणीसाठी उघडली.

दुबईत नोकरीसाठी गेलेल्या आणि भारतात काही दिवसांसाठी परत आलेल्या ख्वाजा युनूसलाही मुंबई पोलिसांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडलं आणि तो कोठडीतून फरार झाल्याचं सांगितलं. पण तो आजपर्यंत सापडलेला नाही.

संसदेवर झालेल्या हल्ल्यामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींना कोर्टाने निर्दोष म्हणून सोडून दिले त्यावेळी पोलिसांनी त्यांना आरोपी म्हणून अडकवण्यासाठी कायदे कसे वळवले होते हे तर जगाच्याच समोर आलं.

भारतात अशा घटना अनेक वर्ष घडत आहेत. त्यांचं समर्थन होऊच शकत नाही. पण केवळ सेलिब्रिटी असल्याने त्यांना वेगळा न्याय आणि गोरगरिबांना मात्र त्यांचा लढाही लढता येऊ नये असं का होतं ?

इम्रान हाश्मीला घर मिळालं नाही म्हणून बॉलिवूडचे अनेक दिग्गज धावून आले, शाहरूखच्या चौकशीविरोधात सरकारने टिट फॉर टॅट म्हणून पत्रक काढलं. पण हीच प्रतिक्रिया सामान्य मुस्लिमांबद्दल मात्र नसते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शाहरूखच्या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आला. अमेरिकन यंत्रणांबद्दल वृथा अभिमान बाळगणारे काही भारतीय आहेत. ९य११ नंतर अमेरिकेवर हल्ला झाला नाही कारण त्यांनी यंत्रणा तशी सज्ज केली. पण भारतावर मात्र आजही दहशतवादी हल्ले होत आहेत, असं त्यांचं आर्ग्युमेंट असतं. (म्हणून अमेरिका ग्रेट ! ) पण स्वतःचा आत्मघात करायचा ठरवलेला माणूस कितीही सुरक्षा असली तरी ती भेदू शकतो याकडे मात्र दुर्लक्ष होतं. पुन्हा तिथे प्रत्येक मुसलमानावर जर संशयाची सुई असेल तर त्यांना जगणं केवळ अशक्य आहे.

पण हे थांबणार कसं हा प्रश्न मला कायम भेडसावतो.