Thursday, February 19, 2009

हॅपिली हेअर आफ्टर!



आपल्याकडे सौंदर्याविषयीचे समज इतके पक्के आहेत की शारीरिक सौंदर्याच्या पलीकडेही काही असू शकतं हे आपण मान्य करत नाही किंवा समजून घेत नाही. उदाहरणच घ्या स्त्रियांचं सौंदर्य केसांवर ठरतं. ते किती लांब, जाड, काळे वगैरे आहेत. पण एखाद्या बाईला जर केसच नसतील तर? तेसुद्धा हॉलीवूडच्या एका सौंदर्यवतीला?

हो! २००२च्या बाँडपटातून 'डाय अनादर डे'मधून अनेकांना घायाळ करणारी हेल बेरी तिच्या आगामी चित्रपटात 'नॅपिल्ली एव्हर आफ्टर'मध्ये चक्क टक्कल करणार आहे.

हा चित्रपट हलकाफुलका, विनोदी असला तरी त्याची कथा ही मात्र एक समस्या समोर आणणारी आहे. सतत गळणा-या केसांना वैतागून हेल बेरी संपूर्ण केस काढून टाकते. पण त्यामुळे तिला किती सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं ते चित्रपटातच पाहायला मिळेल.

हेल स्वत: या चित्रपटातील लुकबाबत मनाशी ठाम नाही. सगळे केस काढून टाकणं आणि लोकांसमोर उभं राहणं तिच्यासाठी कठीण असल्याचं ती सांगते. पण या चित्रपटातील कथा तिला आणि केसांच्या सौंदर्याबाबत कायम काळजीत असणा-या सगळ्या महिलांना एक शिकवण देईल, अशी आशाही तिला वाटते. कदाचित हा चित्रपट पाहून मलाही केस गळल्यावर खूप वाईट वाटणार नाही.

पण कल्पना करा की खरोखरंच तिचा लुक प्रेक्षकांना अपील झाला तर...
...तर काय सगळ्या तरुणी तसा हेअर(पूर्ण)कट करण्यासाठी ब्युटी पार्लरच्याबाहेर रांगा लावतील. कदाचित त्यांना काही तास, दिवसही रांगेत थांबावं लागेल कारण संपूर्ण केस कापण्यासाठी जरा वेळच लागेल ना!
मग या हेअरकटचे दर खूप वाढतील. हा हेअरकट करणारे वेगळे एक्सपर्ट असतील. त्यांच्या खास मुलाखती प्रत्येक न्यूजचॅनेलवर पाहायला मिळतील.

त्याचवेळी दुसरीकडे शॅम्पू, कंडिशनर, केसांचं तेल या कंपन्यांचे मात्र धाबे दणाणतील. त्यांचे सेल कड्यावरून ढकलून दिल्याप्रमाणे एकदम घसरतील. गळणा-या केसांवर हमखास उपचार करणारे अनेक डर्मिटॉलॉजिस्ट आणि ट्रायकॉलॉजिस्टही अडचणीत येतील. मग या कंपन्या आणि तज्ज्ञ काहीही करून या चित्रपटाचं प्रेक्षपण थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेव्हलवर हरएक प्रयत्न करतील.

हेल बेरीला जगभरामध्ये केवळ याच विषयावर बोलण्यासाठी आमंत्रणांची रीघ लागेल. मग तिच्या आयुष्याला या कंपन्यांपासून धोका निर्माण होईल. तिला किडनॅप करण्याचे प्लॅन आखले जातील.

पण यातून आणखी काही समस्या निर्माण होतील, जसं कापलेल्या केसांचं करायचं काय? महापालिका हे केस डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यापासून अटकाव करणारा नियम काढेल. या केसांपासून विग बनवले तरी ते घेणार कोण असा प्रश्न असल्याने तोही उपयोग होणार नाही. मग वेस्टमधून बेस्ट निर्मिती करणा-या काही घरगुती महिला सखी-दुखी सारख्या दुपारी लागणा-या कार्यक्रमात या केसांच्या पिशव्या, शोपीस, फ्लॉवरपॉट, पेंटींग असं काहीतरी कलाकृती करतील. पण तरीही त्यांची संख्या संपणारी नसेल.

अंडरवर्ल्डवालेही या संधीचा फायदा घेतील. महागडी आधुनिक शस्त्र स्मगल करण्यापेक्षा केसाने गळा कापणं सोपं असल्याने ते केसांचे पुंजके जमा करून घोड्याएवजी तेच कमरेला लावून फिरतील.

हे सगळं होत असतानाच एक दिवस अचानक सगळ्या वर्तमानपत्रात जाहिरात येईल. त्यात हेल बेरीला पहिल्यासारखी केसांसकट दाखवली जाईल आणि तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा त्यात असेल 'हॅपिली हेअर आफ्टर!'

Wednesday, February 11, 2009

संस्कृती विरुद्ध चड्डी आणि कोंडोम!

भारतातील श्रीराम सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मंगलोरमधल्या पबवर हल्ला केला आणि मुलींना मारहाण केली. त्याचं प्रतिउत्तर मुलींनीच एवढ्या समर्थपणे दिलं की मी तर श्रीराम सेनेला पाठवलेल्या पिंक चड्ड्या आणि कोंडोमची बातमी वाचून खूष झाले.

त्या प्रसंगानंतर मी लगेच एक लेख लिहिला होता आणि मैत्रिणीच्या सांगण्यावरून एका मासिकाला पाठवून दिला. त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही. पण त्यांनी छापला किंवा नाही छापला तरी या ब्लॉगवर मात्र जरूर टाकीन. तो लेख छापून यायची थोडी आशा असल्याने थांबले आहे.

आता व्हॅलेंटाईन डेसुद्ध जवळ आला आहे. त्यामुळे या संस्कृती रक्षकांचे असले उपद्रव आणखी वाढतील यात शंका नाही. पण मुलींनी त्यांना जे अभिनव पद्धतीने उत्तर दिलंय त्यामुळे सगळेच जरी बुचकळ्यात पडले आहेत.

Monday, February 9, 2009

एक डाव मंदीचा!

माझ्या एका मित्राचा काल फोन आला. खूप घाबरलेला आणि टेन्शनमध्ये होता. त्याच्या कार्यालयातल्या काही लोकांना मंदीचं कारण देऊन सरळ घरी बसवलं होतं. त्याने त्यात आपलं नाव नाही याची खात्री केली पण भीती पूर्णतः त्याच्या मनातून गेलेली नाही. सगळ्या गोष्टी सुरळीत होईपर्यंत प्रत्येक नोकरदार माणूस याच भीतीच्या सावटाखाली राहील असं वाटतंय.

अमेरिकेमधून सुरू झालेल्या या मंदीचं सावट आता सगळ्या जगभर पसरतंय. काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि आणखी काहींच्या जातील अशी सतत वल्गना वृत्तपत्रातून होत आहे. पण हे सर्व होत असूनही माझ्या मनात वारंवार एक प्रश्न उभा राहतो की खरोखरंच मंदीच्या छायेत आपण वावरत आहोत की तसं भास निर्माण केला जात आहे.

मुंबईसारख्या ठिकाणी श्रीमंत किंवा नव-श्रीमंतांच्या फेव्हरेट जागा उदाहरणार्थ मॉल्स, फाईव्ह स्टार हॉटेल्स, महागडे पब्ज इथे मंदीचा जरासाही परिणाम झालेला दिसत नाही. तिथे कोट्यावधीच्या उलाढाली अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. मागच्याच आठवड्यात झालेल्या आयपीएलमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूवर कोट्यावधी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. त्यातही विजय मल्ल्याने मंदीचं कारण पुढे करत त्याच्या किंगफिशर कंपनीच्या अनेक कामगारांची पगारकपात केली होती. अनेकांना घरीही बसवलं होतं. मग एवढे कोट्यावधी पैसे त्याच्याकडे आले कुठून?

अनेकांचे पगार कमी होताना, नोकऱ्या जाताना आपणं पाहिलंय, पण बॉलिवूमध्ये शाहरूखने काही कोटी कमी घेतले, अक्षयला फिल्म डायरेक्टरने कमी पैसे दिले.... अशा बातम्या काही एकायला मिळाल्या नाहीत. फटका बसलाय तो नोकरदार वर्गातल्या सगळ्यात खालच्या फळीला.

त्यामुळे ही मंदी म्हणजे भांडवलदारी समाजाने गरज संपलेल्या लोकांना बाजूला काढण्यासाठी केलेली एक योजना आहे की काय, असा सहज प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. गरजेच्या वेळी त्यांच्याकडून राबवून घेतलं आणि आता त्यांना ठेंगा दाखवला.

दुसरा आणखी एक विचार आला. काही क्षेत्रातल्या लोकांना अवास्तव पगार देण्यात आले. त्यातूनच नव-श्रीमंत वर्ग उदयाला आला. त्यांना राहणीमानाचे विशिष्ट नॉर्म घालून दिले.... राहायला किमान दोन-तीन हजार चौरस फुटाचा फ्लॅट टॉवरमध्ये, चकचकीत इंटीरीअर, दोन गाड्या, नोकर-चाकर, खाणं-पिणं फक्त पॅकेज फूड, शॉपिंग फक्त मॉलमध्ये, वीकएंड एखाद्या फार्महाऊसवर आणि लाँग व्हेकेशन केसरीबरोबर युरोपमध्ये. भांडवलदारांचे मॉल्स चालण्यासाठी या गुळगुळीत जीवनाची इतकी सवय लावली की आजूबाजूची प्रत्येक गोष्टच त्यांना झोपडपट्टी वाटायला लागली.

त्यामुळे कंपनीने म्हणजे अर्थातच भांडवलदारांनी त्यांना भरमसाठ पगार दिला तरी त्यांना ज्या आयुष्याची सवय लावली त्यानुसार हा सगळा पगार पुन्हा शॉपिंगच्या माध्यमातून या भांडवलदारांच्याच खात्यात पडत होता. मग शासनही यामध्ये मागे कसं राहणार. मेट्रो रेल्वेपासून मॉनोरेलपर्यंत सगळ्या इन्फ्रास्टक्चरच्या प्रोजेक्टची त्यांनी उद्घाटनं केली आणि न्यूयॉर्कनंतर मुंबईच असा आभास निर्माण केला.
पण मग मंदी आली आणि अनेकांचे डोळे पांढरे झाले. काही हजार किंवा लाख रुपये पगाराची नोकरीच गेली. आता काय?

हा भांडवलदारांनी एकूणच मंदीचा डाव टाकून खेळ चांगलाच रंगात आणलाय. त्यामध्ये त्यांचा विजय होतो का, आणखी किती काळ हा खेळ सुरू राहणार, कदाचित त्यांनी कंटाळा येईपर्यंत किंवा ते हरेपर्यंत. पण माझं त्यात काय होणार ही चिंता मलाही भेडसावते आहे कारण मीही शेवटी नोकरदारच ठरते.