Monday, February 9, 2009

एक डाव मंदीचा!

माझ्या एका मित्राचा काल फोन आला. खूप घाबरलेला आणि टेन्शनमध्ये होता. त्याच्या कार्यालयातल्या काही लोकांना मंदीचं कारण देऊन सरळ घरी बसवलं होतं. त्याने त्यात आपलं नाव नाही याची खात्री केली पण भीती पूर्णतः त्याच्या मनातून गेलेली नाही. सगळ्या गोष्टी सुरळीत होईपर्यंत प्रत्येक नोकरदार माणूस याच भीतीच्या सावटाखाली राहील असं वाटतंय.

अमेरिकेमधून सुरू झालेल्या या मंदीचं सावट आता सगळ्या जगभर पसरतंय. काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि आणखी काहींच्या जातील अशी सतत वल्गना वृत्तपत्रातून होत आहे. पण हे सर्व होत असूनही माझ्या मनात वारंवार एक प्रश्न उभा राहतो की खरोखरंच मंदीच्या छायेत आपण वावरत आहोत की तसं भास निर्माण केला जात आहे.

मुंबईसारख्या ठिकाणी श्रीमंत किंवा नव-श्रीमंतांच्या फेव्हरेट जागा उदाहरणार्थ मॉल्स, फाईव्ह स्टार हॉटेल्स, महागडे पब्ज इथे मंदीचा जरासाही परिणाम झालेला दिसत नाही. तिथे कोट्यावधीच्या उलाढाली अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. मागच्याच आठवड्यात झालेल्या आयपीएलमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूवर कोट्यावधी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. त्यातही विजय मल्ल्याने मंदीचं कारण पुढे करत त्याच्या किंगफिशर कंपनीच्या अनेक कामगारांची पगारकपात केली होती. अनेकांना घरीही बसवलं होतं. मग एवढे कोट्यावधी पैसे त्याच्याकडे आले कुठून?

अनेकांचे पगार कमी होताना, नोकऱ्या जाताना आपणं पाहिलंय, पण बॉलिवूमध्ये शाहरूखने काही कोटी कमी घेतले, अक्षयला फिल्म डायरेक्टरने कमी पैसे दिले.... अशा बातम्या काही एकायला मिळाल्या नाहीत. फटका बसलाय तो नोकरदार वर्गातल्या सगळ्यात खालच्या फळीला.

त्यामुळे ही मंदी म्हणजे भांडवलदारी समाजाने गरज संपलेल्या लोकांना बाजूला काढण्यासाठी केलेली एक योजना आहे की काय, असा सहज प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. गरजेच्या वेळी त्यांच्याकडून राबवून घेतलं आणि आता त्यांना ठेंगा दाखवला.

दुसरा आणखी एक विचार आला. काही क्षेत्रातल्या लोकांना अवास्तव पगार देण्यात आले. त्यातूनच नव-श्रीमंत वर्ग उदयाला आला. त्यांना राहणीमानाचे विशिष्ट नॉर्म घालून दिले.... राहायला किमान दोन-तीन हजार चौरस फुटाचा फ्लॅट टॉवरमध्ये, चकचकीत इंटीरीअर, दोन गाड्या, नोकर-चाकर, खाणं-पिणं फक्त पॅकेज फूड, शॉपिंग फक्त मॉलमध्ये, वीकएंड एखाद्या फार्महाऊसवर आणि लाँग व्हेकेशन केसरीबरोबर युरोपमध्ये. भांडवलदारांचे मॉल्स चालण्यासाठी या गुळगुळीत जीवनाची इतकी सवय लावली की आजूबाजूची प्रत्येक गोष्टच त्यांना झोपडपट्टी वाटायला लागली.

त्यामुळे कंपनीने म्हणजे अर्थातच भांडवलदारांनी त्यांना भरमसाठ पगार दिला तरी त्यांना ज्या आयुष्याची सवय लावली त्यानुसार हा सगळा पगार पुन्हा शॉपिंगच्या माध्यमातून या भांडवलदारांच्याच खात्यात पडत होता. मग शासनही यामध्ये मागे कसं राहणार. मेट्रो रेल्वेपासून मॉनोरेलपर्यंत सगळ्या इन्फ्रास्टक्चरच्या प्रोजेक्टची त्यांनी उद्घाटनं केली आणि न्यूयॉर्कनंतर मुंबईच असा आभास निर्माण केला.
पण मग मंदी आली आणि अनेकांचे डोळे पांढरे झाले. काही हजार किंवा लाख रुपये पगाराची नोकरीच गेली. आता काय?

हा भांडवलदारांनी एकूणच मंदीचा डाव टाकून खेळ चांगलाच रंगात आणलाय. त्यामध्ये त्यांचा विजय होतो का, आणखी किती काळ हा खेळ सुरू राहणार, कदाचित त्यांनी कंटाळा येईपर्यंत किंवा ते हरेपर्यंत. पण माझं त्यात काय होणार ही चिंता मलाही भेडसावते आहे कारण मीही शेवटी नोकरदारच ठरते.

No comments: